Monday, September 10, 2018

बैलपोळा:- सर्जा-राजाचा सण

कृषी प्रधान संस्कृतीमधला महत्वाचा उत्सव

सर्व शेतकरी बांधवाना हार्दिक शुभेच्छा !
पोळा : सर्जा-राजाचा सण
पोळा श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात. शेतीप्रधान या देशात व शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्त्व आहे. या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो. शेतात पीक धान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात. एकूण सर्वत्र आनंदाचे वातावरण असते.
श्रावण महिन्याची सुरुवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आटोपलेली असते. यासणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावास्या येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे 'पोळा.'
           या दिवशी, बैलांचा थाट असतो. या दिवशी त्यांना कामापासून आराम असतो. तुतारी (बैलांना हाकण्यासाठी वापरण्यात येणारी काडी ज्याचे टोकास, बैलांना टोचण्यासाठी टोकदार लोखंडी खिळा लावला असतो) वापरण्यात येत नाही. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदी, ओढ्यात नेऊन धुण्यात येते. नंतर चारून घरी आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खोंडाला (मान व शरीराचा जोड-खांदा) हळद व तुपाने (सध्या महागाईमुळे तेलाने) शेकले जाते. त्यांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल (एक प्रकारचे चादरीसारखे आवरण), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्या (एक प्रकारचा श्रुंगार), गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी), पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे, खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य. बैलाची निगा राखणार्‍या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.
           या सणासाठी शेतकर्‍यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजश्रुंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात. गावाच्या सीमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्याजवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील, श्रीमंत जमीनदार) यांच्यातर्फे तोरण तोडले जातेव पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते. बैल नेणार्‍यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात. असा हा पोळ्याचा सण आहे.
         www.vikasparv.blogspot.com  पोळ्याचे महत्त्व शेतकरी वर्गात फार आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्‍याचा सखा, मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घालतो. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात. शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झूल टाकली जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात. अशा नाना तर्‍हेने सजविण्यात येते. शेतकर्‍याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा व रांगोळ्या काढून त्या पाहुण्यांची वाट पाहत असतात. तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते. दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्नीक वाजतगाजत जातात व त्याला 'अतिथी देवो भव:'प्रमाणे घरी आणतात. घरातील सुहासिनी बैलांची विधिवत पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देतात. त्यासोबत त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान मांडतात. या दिवशी गावातील इतर घरातूनही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते. शेतकर्‍यालाऔक्षण करून त्याला नारळ दिले जाते तर बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते. महाराष्ट्रातील काही गावामध्ये या दिवशी बैलांच्या शर्यतीचे आयोजन करून तेथे पोळा फोडला जातो. ज्या शेतकर्‍याचा बैल पोळा फोडेल म्हणजेच शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे झूल टाकली जाते व शेतकर्‍याच्या डोक्यावर फेटा बांधून त्याचा सन्मान केला जातो. त्यानंतर गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. अशा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकर्‍याचा जिव्हाळ्याचा सण पारंपरिक पोळा साजरा केला जातो.
          याच पिठोरी अमावस्येच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया व्रत करतात. दिवसभर उपवास करून सायंकाळी स्नान करतात. चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. घरातील मुलास अथवा मुलीस खीरपुरीचे जेवण देतात. पुरणपोळी खांद्यावरून मागे नेत 'अतित कोण?' असा प्रश्न विचारतात. आपल्या मुलाचे नाव घेऊन त्या प्रश्नाचे उत्तर देतात. स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावे यासाठी पिठोरी अमावस्येला फक्त स्त्रियाच हे व्रत मनोभावे करतात.

Tuesday, September 4, 2018

शिक्षक मनातले

नमस्कार,
        माझं नाव विकास राऊत. सतत दुष्काळी नावाने प्रसिद्ध असलेल्या सांगोला तालुक्यात मेडशिंगी नावाचं छोटंसं गावात माझा जन्म झाला. याच गावात माझं प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. शिक्षण हा विषय जसा प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचा विषय तितकाच माझ्याही आयुष्यात.
      5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस गुरू पौर्णिमा म्हणूनही साजरा करण्यात येतो. ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस. तसं पाहिलं तर मी  माझ्या आयुष्य आज पर्यंत जवळजवळ 100 शिक्षकांकडून तरी ज्ञान प्राप्त केले आहे. माझं शिक्षण सांगायचं झालं तर मी संगणक शास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले आहे तसेच पत्रकारिता क्षेत्रातील पदवी प्राप्त केली आहे तसेच आपणही शिक्षकच व्हावं या उद्देशाने मी बी.एड ही पूर्ण केले आहे. याच बरोबर अनेक प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील पूर्ण केले आहेत. या सर्व शिक्षणामुळे मला अनेक शिक्षकांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाले त्यामुळे मला मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या सर्व गुरुजनांना प्रथम मी शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
     अनेक शिक्षक होऊन गेले सर्वच शिक्षकांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले पण याठिकाणी मी आवर्जून नमूद करावे वाटते असे शिक्षक म्हणजे श्री बंडोपंत राऊत (गुरुजी) व श्री विश्वास पाटील (सर).
    शिक्षक म्हणलं की याच दोन मूर्ती माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहतात.  प्रथम मी श्री बंडोपंत राऊत गुरुजी यांच्या विषयी माझी कृतज्ञता व्यक्त करेन. हे माझे पाहिले शिक्षक जे मला प्राथमिक शिक्षक म्हणून एका वस्तीशाळेवर मला शिकवत होते. अत्यंत सुस्वभावी, सर्व विषय अत्यंत सोप्या पद्धतीने शिकवण्यात पारंगत होते. यांच्या मुळेच आज मी उच्च शिक्षण प्राप्त केले. यांनी शिकण्याची प्रेरणा माझ्या बरोबरच इतर विद्यार्थ्यांनाही दिली होती. मला तर आठवतं राऊत गुरुजी आम्हा 3-4 विध्यार्थ्यांना एकाच वेळी  स्कॉलरशिप परीक्षेसाठी आपल्या सायकल वरून 10 की.मी वर असणाऱ्या केंद्रावर न्यायचे. आजही ते त्याच तत्परतेने काम करताना मला दिसतात. आजही ते  समोरून जाताना मला स्मितहास्य देऊन पुढे जातात आणि दिवसभराची प्रेरणा देऊन जातात.
               या नंतर मला कृतज्ञता व्यक्त करावी वाटते ती म्हणजे श्री विश्वास पाटील (सर) यांच्याबद्दल.
हे गुरू म्हणजे कोणताही विषय सहज समजून सांगणारे चालते बोलते विद्यापीठच. आज जे उच्च शिक्षण पूर्ण केले आहे त्यात पाटील सर यांचा मोलाचा वाटा आहे. यांच्याकडे आम्ही शिकवणी साठी जात होतो. यांची शिकवणी म्हणजे आमच्यासाठी शिक्षण क्षेत्रातील स्वर्ग होता. खूप चांगले शिक्षण देऊन आज यांनी आज अत्यंत बुद्धिवान विध्यार्थी तयार केले.
 
              या दोन शिक्षकांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो. याच बरोबर माझ्या शिक्षकांचे मी आभार मानतो. आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळेच आज मी एक सक्षम नागरिक बनलो याचे संपूर्ण श्रेय मी आपल्या सर्वांना देतो व पुन्हा एकदा सर्वांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो .
              .                                                                                                                  आपला नम्र
                                                                                                                          विकास किसन राऊत  
                                                                                                               (MCA.BJ.Bed)
                                                                                                               मु. पो मेडशिंगी
                                                                                                               ता. सांगोला
                                                                                                           जि. सोलापूर

नक्षत्रा (कविता)

माझ्यात रमणारी ती पहिलीच वेडी होती
मला स्वतःत सामावणारी ती पहिलीच होती
मला तिच्यात हरवून, वेड लावणारी तिचं होती
माझ्यावर तेव्हा प्रेम करणारी ती पहिलीच होती
                 
                   स्वतः जगण सोडून मला जगायला शिकवणारी तिची प्रीत होती
                   साखरेहुनही गोड तिची अन माझी सावनप्रीत होती.
                   माझ्या साठी मात्र ती सदाबहार गीत होती
                   माझ्यावर प्रेम करणारी ती पहिलीच होती.

माझं मन राखून जगण्याची तिची भलतीच जिद होती
तिच्यात मी अन माझ्यात ती पूर्ण अधीन होती
प्रेमाखातर मात्र ती संपूर्ण माझ्यात लीन होती
माझ्यावर प्रेम करणारी ती वेडी पहिलीच होती.

                  इतक्या वेदना....... विखुरलेल्या स्वप्नांच्या
                  हरवलेल्या दिशांच्या... पसरलेल्या काळोखाच्या
                  क्षणात नाहीस करणारी ती जादुगारीन होती.
                  माझ्यावर प्रेम करणारी ती पहिलीच होती.

लिहून तिला कळवावं म्हणतो,
माघारी मी तिच्याबद्दल खर काय ते लिहू शकतो
माझ्यासाठी काल ही आज ही ती नक्षत्रच होती
माझ्यावर प्रेम करणारी ती पहिलीच होती.
www.vikasparv.blogspot.com

                   
                   

छत्रपती शिवाजी महाराज

                    नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी। नमो धर्मभूमी जिच्या कामी, पडो देह माझा सदा ती नमामी ।। परमप...