Monday, September 10, 2018

बैलपोळा:- सर्जा-राजाचा सण

कृषी प्रधान संस्कृतीमधला महत्वाचा उत्सव

सर्व शेतकरी बांधवाना हार्दिक शुभेच्छा !
पोळा : सर्जा-राजाचा सण
पोळा श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात. शेतीप्रधान या देशात व शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्त्व आहे. या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो. शेतात पीक धान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात. एकूण सर्वत्र आनंदाचे वातावरण असते.
श्रावण महिन्याची सुरुवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आटोपलेली असते. यासणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावास्या येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे 'पोळा.'
           या दिवशी, बैलांचा थाट असतो. या दिवशी त्यांना कामापासून आराम असतो. तुतारी (बैलांना हाकण्यासाठी वापरण्यात येणारी काडी ज्याचे टोकास, बैलांना टोचण्यासाठी टोकदार लोखंडी खिळा लावला असतो) वापरण्यात येत नाही. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदी, ओढ्यात नेऊन धुण्यात येते. नंतर चारून घरी आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खोंडाला (मान व शरीराचा जोड-खांदा) हळद व तुपाने (सध्या महागाईमुळे तेलाने) शेकले जाते. त्यांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल (एक प्रकारचे चादरीसारखे आवरण), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्या (एक प्रकारचा श्रुंगार), गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी), पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे, खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य. बैलाची निगा राखणार्‍या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.
           या सणासाठी शेतकर्‍यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजश्रुंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात. गावाच्या सीमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्याजवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील, श्रीमंत जमीनदार) यांच्यातर्फे तोरण तोडले जातेव पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते. बैल नेणार्‍यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात. असा हा पोळ्याचा सण आहे.
         www.vikasparv.blogspot.com  पोळ्याचे महत्त्व शेतकरी वर्गात फार आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्‍याचा सखा, मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घालतो. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात. शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झूल टाकली जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात. अशा नाना तर्‍हेने सजविण्यात येते. शेतकर्‍याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा व रांगोळ्या काढून त्या पाहुण्यांची वाट पाहत असतात. तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते. दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्नीक वाजतगाजत जातात व त्याला 'अतिथी देवो भव:'प्रमाणे घरी आणतात. घरातील सुहासिनी बैलांची विधिवत पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देतात. त्यासोबत त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान मांडतात. या दिवशी गावातील इतर घरातूनही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते. शेतकर्‍यालाऔक्षण करून त्याला नारळ दिले जाते तर बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते. महाराष्ट्रातील काही गावामध्ये या दिवशी बैलांच्या शर्यतीचे आयोजन करून तेथे पोळा फोडला जातो. ज्या शेतकर्‍याचा बैल पोळा फोडेल म्हणजेच शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे झूल टाकली जाते व शेतकर्‍याच्या डोक्यावर फेटा बांधून त्याचा सन्मान केला जातो. त्यानंतर गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. अशा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकर्‍याचा जिव्हाळ्याचा सण पारंपरिक पोळा साजरा केला जातो.
          याच पिठोरी अमावस्येच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया व्रत करतात. दिवसभर उपवास करून सायंकाळी स्नान करतात. चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. घरातील मुलास अथवा मुलीस खीरपुरीचे जेवण देतात. पुरणपोळी खांद्यावरून मागे नेत 'अतित कोण?' असा प्रश्न विचारतात. आपल्या मुलाचे नाव घेऊन त्या प्रश्नाचे उत्तर देतात. स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावे यासाठी पिठोरी अमावस्येला फक्त स्त्रियाच हे व्रत मनोभावे करतात.

Tuesday, September 4, 2018

शिक्षक मनातले

नमस्कार,
        माझं नाव विकास राऊत. सतत दुष्काळी नावाने प्रसिद्ध असलेल्या सांगोला तालुक्यात मेडशिंगी नावाचं छोटंसं गावात माझा जन्म झाला. याच गावात माझं प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. शिक्षण हा विषय जसा प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचा विषय तितकाच माझ्याही आयुष्यात.
      5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस गुरू पौर्णिमा म्हणूनही साजरा करण्यात येतो. ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस. तसं पाहिलं तर मी  माझ्या आयुष्य आज पर्यंत जवळजवळ 100 शिक्षकांकडून तरी ज्ञान प्राप्त केले आहे. माझं शिक्षण सांगायचं झालं तर मी संगणक शास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले आहे तसेच पत्रकारिता क्षेत्रातील पदवी प्राप्त केली आहे तसेच आपणही शिक्षकच व्हावं या उद्देशाने मी बी.एड ही पूर्ण केले आहे. याच बरोबर अनेक प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील पूर्ण केले आहेत. या सर्व शिक्षणामुळे मला अनेक शिक्षकांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाले त्यामुळे मला मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या सर्व गुरुजनांना प्रथम मी शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
     अनेक शिक्षक होऊन गेले सर्वच शिक्षकांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले पण याठिकाणी मी आवर्जून नमूद करावे वाटते असे शिक्षक म्हणजे श्री बंडोपंत राऊत (गुरुजी) व श्री विश्वास पाटील (सर).
    शिक्षक म्हणलं की याच दोन मूर्ती माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहतात.  प्रथम मी श्री बंडोपंत राऊत गुरुजी यांच्या विषयी माझी कृतज्ञता व्यक्त करेन. हे माझे पाहिले शिक्षक जे मला प्राथमिक शिक्षक म्हणून एका वस्तीशाळेवर मला शिकवत होते. अत्यंत सुस्वभावी, सर्व विषय अत्यंत सोप्या पद्धतीने शिकवण्यात पारंगत होते. यांच्या मुळेच आज मी उच्च शिक्षण प्राप्त केले. यांनी शिकण्याची प्रेरणा माझ्या बरोबरच इतर विद्यार्थ्यांनाही दिली होती. मला तर आठवतं राऊत गुरुजी आम्हा 3-4 विध्यार्थ्यांना एकाच वेळी  स्कॉलरशिप परीक्षेसाठी आपल्या सायकल वरून 10 की.मी वर असणाऱ्या केंद्रावर न्यायचे. आजही ते त्याच तत्परतेने काम करताना मला दिसतात. आजही ते  समोरून जाताना मला स्मितहास्य देऊन पुढे जातात आणि दिवसभराची प्रेरणा देऊन जातात.
               या नंतर मला कृतज्ञता व्यक्त करावी वाटते ती म्हणजे श्री विश्वास पाटील (सर) यांच्याबद्दल.
हे गुरू म्हणजे कोणताही विषय सहज समजून सांगणारे चालते बोलते विद्यापीठच. आज जे उच्च शिक्षण पूर्ण केले आहे त्यात पाटील सर यांचा मोलाचा वाटा आहे. यांच्याकडे आम्ही शिकवणी साठी जात होतो. यांची शिकवणी म्हणजे आमच्यासाठी शिक्षण क्षेत्रातील स्वर्ग होता. खूप चांगले शिक्षण देऊन आज यांनी आज अत्यंत बुद्धिवान विध्यार्थी तयार केले.
 
              या दोन शिक्षकांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो. याच बरोबर माझ्या शिक्षकांचे मी आभार मानतो. आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळेच आज मी एक सक्षम नागरिक बनलो याचे संपूर्ण श्रेय मी आपल्या सर्वांना देतो व पुन्हा एकदा सर्वांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो .
              .                                                                                                                  आपला नम्र
                                                                                                                          विकास किसन राऊत  
                                                                                                               (MCA.BJ.Bed)
                                                                                                               मु. पो मेडशिंगी
                                                                                                               ता. सांगोला
                                                                                                           जि. सोलापूर

नक्षत्रा (कविता)

माझ्यात रमणारी ती पहिलीच वेडी होती
मला स्वतःत सामावणारी ती पहिलीच होती
मला तिच्यात हरवून, वेड लावणारी तिचं होती
माझ्यावर तेव्हा प्रेम करणारी ती पहिलीच होती
                 
                   स्वतः जगण सोडून मला जगायला शिकवणारी तिची प्रीत होती
                   साखरेहुनही गोड तिची अन माझी सावनप्रीत होती.
                   माझ्या साठी मात्र ती सदाबहार गीत होती
                   माझ्यावर प्रेम करणारी ती पहिलीच होती.

माझं मन राखून जगण्याची तिची भलतीच जिद होती
तिच्यात मी अन माझ्यात ती पूर्ण अधीन होती
प्रेमाखातर मात्र ती संपूर्ण माझ्यात लीन होती
माझ्यावर प्रेम करणारी ती वेडी पहिलीच होती.

                  इतक्या वेदना....... विखुरलेल्या स्वप्नांच्या
                  हरवलेल्या दिशांच्या... पसरलेल्या काळोखाच्या
                  क्षणात नाहीस करणारी ती जादुगारीन होती.
                  माझ्यावर प्रेम करणारी ती पहिलीच होती.

लिहून तिला कळवावं म्हणतो,
माघारी मी तिच्याबद्दल खर काय ते लिहू शकतो
माझ्यासाठी काल ही आज ही ती नक्षत्रच होती
माझ्यावर प्रेम करणारी ती पहिलीच होती.
www.vikasparv.blogspot.com

                   
                   

Monday, August 27, 2018

सोशल मिडिया आणि मी

विदारक सत्य (फुल टायमपास )

         आपला भारत देश विकसनशील देश आहे. जगात भारत देश लोकसंखेच्या तुलनेत दुसऱ्या स्थानावर आहे. पण मित्रांनो आपल्या देशाला एक भयानक रोग सतावतो आहे तो म्हणजे "सोशल मिडिया". या रोगाची प्रमुख लक्षण विचारलं तर  माणसाच माणूसपण हिरावून घेतो हा रोग.., स्वतः जगापेक्षा वेगळे आणि खूप हुशार आहोत याचा अहंकार मनात आणतो हा रोग. कुठलीही गोष्ट सगळ्यांच्या आधी मलाच माहित होते अशी भावना हा रोग झाल्यावर होते. यावर अजून तरी कुठे उपचार उपलब्ध नाही.
 
         सोशल मिडिया ही जितकी भयानक आहे असं मी म्हणतोय त्यापेक्षा ती कितीतरी पटीने फायद्याची आहे बर का मित्रांनो.... पण त्याचा वापर आज फक्त आणि फक्त मनोरंजन, सामाजिक तेढ निर्माण करणे, फुकटची प्रसिद्धी मिळवणे, आणि इतरांची उणी दुणी काढणे, बदनामी करणे यासाठीच केला जातोय हे अशोभनीय आहे.



         खर तर मोठ्या प्रमाणात इंटरनेट अगदी मोफत उपलब्ध झालं ही चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल कारण यामुळे आपल्याला आधुनिक तंत्रज्ञान समजून घेता येऊ लागले. अनेक नवनवीन गोष्टीची माहिती आपणास सहज उपलब्ध होऊ लागली. परंतु आजचा माझा तरूण मित्र या नवनवीन माहिती पेक्षा तासनतास फेसबुक, व्हाटसअप ट्वीटर सारख्या सोशल मिडिया अॅपवर फक्त स्क्रोल खाली वर करत बसलेला असतो. बर ते ठीक आहे की तुम्ही या सर्वांचा वापर खूप करता, तुम्ही सोशल मिडिया वर खूप पारंगत आहात पण तुमच स्वतःच्या काय चांगल्या पोस्ट त्यावर असतात का?  हाही विचार आपण करूया. कुणाच्या तरी भंगार, टुकार पोस्ट ला आपण
धुरर्र.... कडक..... राडा..... अशा कॉमेंट करतो पण त्याचा आणि पोस्ट चा संदर्भ मला अजूनपर्यंत समजला नाही. मी याच्या विरोधात नाही पण पोस्ट आणि कॉमेंट यामध्ये थोडीशी साम्यता असावी असं मला वाटत.

        आता राहिला प्रश्न यु-ट्यूब सारख्या महान अप्लिकेशनचा. तर हे अॅप आजच्या तरूण पिढी, महिला, भगिनी यासाठी वरदानच आहे असं मी मानतो. जे जे शिकण्याची इच्छा आहे ते ते या एका अॅपवर आपणास मिळेल पण इथे शिकायचं कुणाला आहे, इथे तर आम्हाला फक्त मनोरंजन करायच आहे. या यु-ट्यूब ने मी आजवर खूप काही शिकलो कुठलही तंत्रज्ञान असो वा कोणतीही माहिती यावर सहज मिळते. पण आपण शोधतो त्या संस्कृती नसलेल्या बॉलीवूड च्या नट-नट्यांचे व्हिडीओ. अरे काय चाललंय काय. जरा भान बाळगूया आपण, परराष्ट्राच्या संस्कृतीच घाणेरड दर्शन आहे ते बॉलीवूड म्हणजे..... आणि तेच आपले आदर्श हिरो असतात म्हणे. अरे खर तर आपला बाप आपला हिरो, आदर्श  आणि आपल सर्व काही असलं पाहिजे. बापाच्या मनातून निघालेला धूर आपणास कधी दिसणार नाही पण एखाद्या टुकार मित्राच्या पोस्ट चा धूर लगेच दिसतो आपल्याला.

       आता तर मी माझ्या तरूण कर्तबगार मित्रांचा वाढदिवसाचा नवीनच ट्रेड पाहतो आहे. अरे काय ते सेलेब्रेशन असतं खूप अप्रूप वाटत मला. आणि त्यात ते स्टेटस पाहून तर मन अचंबित होत. पण मित्रानो याचा जास्त काही फायदा होत नसतो आपल्या आयुष्यात. अडचण आल्यावर तुमच्या ५००० मित्रापैकी फक्त 5 मित्र तुमच्या सोबत असू द्या मग मानतो राव तुम्हाला. फुकटचा खुळचट पणा म्हणायचं याला. ज्याच्या तोंडावर माशी पण बसत नाही त्याचे गावातल्या चौकात मोठ मोठे होर्डिंग पाहून मन अचंबित होत, अरे कशासाठी हे. तेच पैसे तू घरात एखाद्या कामाला लावून बघ किती समाधान असतं आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर.

       हे रोज मिळणार 1 जीबी इंटरनेट आपण सगळ्यात मोठे बेरोजगार आहोत याची जाणीवच होऊ देत नाही. रोज 1 जीबी इंटरनेट संपवावं वाटत असेल तर नक्कीच यु-ट्यूब वर नवनवीन कलात्मक गोष्टी, नवनवीन तंत्रज्ञान, नवीन माहिती, शोधण्यावर नक्कीच खर्च करूया. उगाच कुणाच्या तरी पोस्टला लाईक कमेंट करत बसण्यापेक्षा आपले स्वतःचे विचार मांडूया. उगाच मोठा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा तेच पैसे अनाथ आश्रमात एक दिवस खाऊ, शैक्षणिक साहित्य वाटप करूया. त्याची प्रसिद्धी नाही केली तरी चालेल पण आपल हेच काम कुणाच्यातरी जगण्याला उर्मी देऊन जाईल व आपल्याला मानसिक समाधान.

      बऱ्याच दिवसांची खंत मी या लेखातून अगदी कमी वेळेत आपल्या समोर मांडली आहे. यात अजून काही मुद्दे राहिलेही आहेत ते आपण या पोस्ट च्या कमेंट मध्ये लिहावेत.बऱ्याच मित्रांनी ही पोस्ट टोचू शकते सर्व लिखाण काल्पनिक आहे यात कोणी स्वतःला गुंतवून घेऊ नये. यासाठी तर मी या पोस्ट ला नाव देताना "सोशल मिडिया व मी" असेच दिले आहे, पण यातील जागृती नक्कीच लक्षात घ्यावी.
 धन्यवाद.....

आपला नम्र 
नवोदित लेखक 
श्री विकास राऊत (MCA, BJ, Bed)
9637790142

Friday, August 24, 2018

टॉपर मुली?

लग्नानंतर कुठे जातात या टॉपर मुली?


सोशल मीडियावर एक जोक फिरत होता... मुली बोर्डात टॉप, mpsc मध्ये टॉप, इंजिनीरिंग डॉक्टरकी मध्ये टॉप... मग बहुतांश शास्त्रज्ञ आणि मोठमोठे लोकं पुरुष का असतात? तेव्हा कुठे जातात या टॉपर मुली..?
मग थोडा खोलवर विचार केला की, या टॉपर मुली तेव्हा नाती सांभाळत असतात, कोणी हातात बाळ घेऊन जगण्याशी लढत असतात, कोणी नवऱ्याचे डबे बनवत असतात आणि कोणी कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी सुद्धा होत असतात.

मुलींचं शिक्षण आपल्या आई वडिलांकडे असतात तोवर सुरळीत होत असते, घरात कसलीही जबाबदारी नाही, आणि मग अचानक लग्न होतं, आणि एक मोठी जबाबदारी येऊन पडते... मुलीचे आई वडील आपल्या मुलीच्या करिअर संबधी खूप विचार करतात, पैसा ओततात पण आजही अशी परिस्थिती आहे की लग्नानंतर सासरची मंडळी या सर्व गोष्टींना नगण्य मानतात, मुलींचं शिक्षण, त्यांचं करिअर या गोष्टींपेक्षा तिला स्वयंपाक आणि घरातली कामं किती येतात यावरून तिची पारख होते. एखादी टॉपर असेल, पण स्वयंपाक येत नसेल तर "काय उपयोग एवढं शिकून? साधा स्वयंपाक येत नाही..."



याउलट एखादी पहिली नापास पण स्वयंपाक उत्तम येत असेल तर "फार हुशार आहे हो, काय स्वयंपाक बनवते.." भाजीत तेल जास्त झाले, मीठ कमी झाले, मसाला कमी पडला, पोळ्या कडक झाल्या किंवा भाजी पातळ झाली तर अक्षरशः मुलीच्या आणि तिच्या खानदानाचा उद्धार करणारे बरेच असतात... "खुशाल नोकरीवर जातेस, घरी सगळी कामं माझ्या आईला करावी लागतात" "नुसती करायची म्हणून कामं करतेस, भांड्यांना साबण तसाच असतो, भाजीत केस निघाला.." "मी एवढी वर्षे संसार केला पण कधी भाजीत खडा निघाला नाही" "डोळे खाली करून बोलायचं,मोठ्या आवाजात बोललीस?? (गालावर खाडकन ...) या सगळ्या चक्रव्यूहात या मुली अडकत जातात अडकत जातात आणि बाजूला राहतं ते त्यांचं शिक्षण आणि हुशारी.

कोणीही पोटातून शिकून येत नाही आणि कालपर्यंत शिक्षण आणि करिअर मध्ये गुंतलेल्या मुलीला सगळं शिकायला आणि नीट जमायला बराच वेळ लागेल हे कोणी समजून घेतं का??

लता मंगेशकर खरंच यांनी लग्न केलं नाही म्हणून का त्यांचा कर्तुत्वाला थांबवू शकलं नाही कोणी? की मेरी कोम च्या नवऱ्याने घरातली अगदी स्वयंपाकपासून ते बाळ सांभाळण्याची जबाबदारी उचलली म्हणून ती जिंकत गेली?? माझी  एक मैत्रीण, भाग्यश्री ...अत्यंत हुशार, शाळेत कायम पहिली, कधी कुणाशी वैर नाही की कोणत्या मुलाशी भानगड नाही...आई वडिलांनी भरपूर पैसे खर्च करून शिकवलं.. मोठे क्लासेस लावले.. चांगले कॉलेज पाहिले..ही भविष्यात काहीतरी करणार अशी सगळ्यांची आशा..

अशीच माझी एक मैत्रिण भाग्यश्री . काही दिवसांपूर्वी भेटली, शाळेत नेहमी पुढेपुढे करणारी,  अभ्यासात अत्यंत हुशार ...
1 वर्षाच्या मुलाला घेऊन आलेली, "आणि विचारते की तुझ्या क्लास मध्ये एखादा विषय आहे का शिकवायला, मी घेत जाईल क्लास, कमी पगार असला तरी चालेल" ऐकून धक्का बसला, विचारपूस केल्या नंतर कळलं, तिच्या आई वडिलांनी अमाप पैसा असलेल्या मुलाशी लग्न लावून दिलं, पण घरात बायकोला थोडेफार पैसे देऊन सगळा हिशोब मागायचा... बायकोला कामावर जाऊ देत नसे, मुल होण्यासाठी घाई केली आणि भाग्यश्रीला  त्यात पूर्ण अडकवून दिलं, घरात रोजचे पाहुणे, त्यांचं आगत स्वागत, भाग्यश्री ने घरी बसून काही उद्योग करावा हेही तिच्या नवऱ्याला आवडत नसे, बाळाला सांभाळायला तयार नसे...

मनात विचार आला, एखादं टाइम मशीन पाहिजे होतं, 7 वर्षा नंतर आपली टॉप आलेली मुलगी कुठे असेल हे आई वडिलांना त्यात दिसायला पाहिजे होतं... आता सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल, की कुठे जातात या टॉपर मुली... असतात या आपल्याच आजूबाजूला, डोक्यावर पदर घेऊन सासुसोबत पूजेला जात असतात तर कोणी नवऱ्याचा मित्रांना चहा नाश्ता बनवत असतात...कधी त्या आपल्यातच असतात..!!!
  
(हा ब्लॉग मुली संधर्भात वाचण्यात आलेल्या लेखावरून लिहिण्यात आला आहे. सत्य परिस्थिती मांडणाचा प्रामाणिक प्रयत्न आपला अभिप्राय मला अजून काम करण्यास उद्युक्त करतात)
www.vikasparv.blogspot.com

Tuesday, August 21, 2018

वर्तमान जीवन जगा

वर्तमानात जगा
माणूस विचार करणारा प्राणी आहे. त्यामुळे सतत त्याच्या डोक्यात काही ना काही विचार चालू असतो.माणसाला खरे तर भविष्याची काळजी अधिक सतावत असते. त्यामुळे तो सतत डोक्यात राख घालून घेऊन वावरत असतो. भविष्याची काळजी करत असताना तो प्रत्यक्षात भुतकाळातल्या घटनांशी चिकटून बसलेला असतो. साहजिकच त्याची प्रगती होताना दिसत नाही. कारण तो वर्तमानात जगतच नसतो. वास्तविक आपण मागचा-पुढचा विचार न करता वर्तमानात भरभरून जगलं पाहिजे. वर्तमान कसा जगला यावर भविष्य अवलंबून आहे. माणसाने गेलेल्या गोष्टी विसरून पुढे पुढे गेले पाहिजे. यालाच आयुष्य म्हणतात. याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे पाणी. पाणी जोपर्यंत वाहत असते,तोपर्यंत ते स्वच्छ,निर्मळ, ताजे असते. ते एकाच ठिकाणी साठले म्हणजे मात्र त्याला दुर्गंधी यायला लागते. त्यात अपायकारक जीव-जंतू वाढायला लागतात. तसे स्वत:लाही चांगले, काही तरी खास बनवायचे असेल तर पुढे पुढे जात राहिले पाहिजे. वाटेत येणार्‍या समस्या, अडथळे दूर सारून स्वत:ला एक अनुभवसिद्ध बनवले पाहिजे.त्याचाच उपयोग आपल्या भावी जीवनात होत असतो.

 काही माणसे भुतकाळात यशस्वी झालेल्या महान व्यक्तींचे विचार आत्मसात करतात. पण असेही काही माणसे असतात की, ते भुतकाळातील लोकांमध्ये आणि भुतकाळात आपल्यासोबत घडलेल्या घटनांमध्येच हरवून जातात. अशी माणसे आजच्या संबंधीत गरजा, समस्या आणि त्याच्या जाणिवा यांची काळजी करताना दिसत नाहीत. खरे तर जुन्या-नव्या आणि भुत-वर्तमान यांची सांगड घालून आयुष्य जगायचे असते. त्यातून बोध घेऊन आपले आयुष्य यशस्वी बनवायचे असते. जर तुम्ही भुतकाळात आणि त्यातल्या घटनांमध्येच अडकून पडलात तर मात्र तुम्ही त्याचा विचार करून करून त्रासून जाणार.अशा लोकांना मग वर्तमानापेक्षा भविष्याचीच अधिक चिंता लागून राहिलेली असते. ही माणसे विचार करतात की, आपला वर्तमान कसाही असू दे,पण भविष्यकाळ मात्र जबरदस्त असला पाहिजे. पण त्यांना याची जाणीव नसते की, ते आपला वर्तमान योग्य प्रकारे जगत नाहीत,तिथे भविष्याची गॅरंटी कोण देणार? वर्तमानावरच भविष्य अवलंबून असते.

महात्मा गांधीजींनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, तुमचे भविष्य तुम्ही आज काय करताय, या गोष्टीवर अवलंबून आहे. त्यामुळे भूत आणि भविष्याची काळजी सोडून वर्तमान चांगल्या प्रकारे जगण्यासाठी कामाला लागा. हीच सुखद जाणीव आहे. जर तुम्ही आजचा उपयोग योग्य प्रकारे करू शकलात तर तुमचे भविष्यदेखील उज्ज्वल असणार आहे.
वर्तमान चांगला बनवण्यासाठी आपण आपल्यापेक्षा मोठ्या किंवा महान व्यक्तींच्या भूतकाळातून काही शिकण्याची आवश्यकता नाही.जर शिकण्याची दृष्टी असेल तर आपण आपल्या वयाच्या छोट्या व्यक्तीकडूनदेखील शिकू शकतो.स्वत:ला उत्तम बनवण्यासाठी काही ऊर्जावान लोकांच्या भेटी घ्यायला हव्यात. त्यांच्याकडून काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. विशेष म्हणजे आपण आशावादी राहिले पाहिजे. आशा केल्याने जीवनात नव्या आशेचा संचार होतो.www.vikasraut.blogspot.com
शब्दांकन :- श्री विकास राऊत ९६३७७९०१४२

Monday, August 20, 2018

गरुडझेप

गरुडझेप

           आई-वडील दोघेही सर्व सामान्य. रा. बलवडी मुलगाही शाळेत अत्यंत हुशार म्हणून लगेच कोणत्याही इंग्रजी शाळेत त्याला न घालता त्यांनी विश्वास टाकला तो नाझऱ्यामधील श्रीधर कन्या प्रशालेवर, यामुळे शाळेसाठी दररोज करावा लागणारा सात किलोमीटरचा प्रवास कधी सायकल तर कधी वडिलांबरोबर. सकाळी शाळेला आले की अभ्यास पूर्ण करूनच रात्री घरी परतायचे असा त्याचा दिनक्रम. मोठ्या जिद्दीने अभ्यास केला आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात तिसरा येण्याचा मान मिळवला. जयदीप नेताजी शिंदे असे या गुणवंत विद्यार्थ्याचे नाव आहे. जयदीपने ३०० पैकी २६४ गुण मिळविले. 
           शिष्यवृत्ती परीक्षेत हमखास यश आणि सांगोला तालुक्यातील नाझरे या अत्यंत ग्रामीण भागातील श्रीधर कन्या प्रशाला शाळा हे समीकरण अलीकडे घट्ट झाले आहे. फक्त जयदीपच नव्हे तर याच शाळेची विद्यार्थिनी कु. प्रेरणा संभाजी पवार हिनेही इ पाचवी मधून शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात तिसरा येण्याचा मान मिळवला. प्रेरणाने भाषा व गणित  विषयांत १४० गुण व इंग्रजी व बुद्धिमत्ता विषयांत १२८ गुण असे एकूण २६८ गुण मिळवले या शाळेचे तब्बल 11 विध्यार्थी राज्य शासनाच्या गुणवत्ता यादीत आले आहेत तसेच  यापूर्वी अनेक  विद्यार्थी  शिष्यवृत्तीधारक बनले आहेत. याच शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी फक्त शिष्यवृत्तीच नव्हे तर महाराष्ट्र शासनाद्वारे राबवल्या जाणाऱ्या सर्वच
परीक्षेत यापूर्वीदेखील घवघवीत यश प्राप्त केले आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश परिचारक यांचे नियोजन, सर्वच शिक्षकांची जिद्द आणि विद्यार्थ्यांची चिकाटी यामुळे हे शक्‍य झाले आहे.

          जयदिपचे घर शाळेपासून सात किलोमीटर अंतरावर आहे. शाळेत सकाळी सात वाजता तो आपल्या वडिलांबरोबर येतो तर कधी स्वतः सायकलवर.  दोन तास शाळेत शिष्यवृत्तीचे जादा तास मार्गदर्शक शिक्षक घेतात. येताना आणलेला डबा दहा वाजता खाऊन पुन्हा ११ ते ५ पर्यंत नियमित अभ्यासक्रम शिकवला जातो. विशेष म्हणजे या शाळेत येणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांची प्रगती वाखाणण्याजोगी आहे याचे कारण सेवाभावी वृत्तीने शिक्षक हे काम करतात.

           जयदीपने भाषा व गणित विषयांत १३२ गुण व इंग्रजी व बुद्धिमत्ता विषयांत  १३२ गुण मिळवले आहेत. पहिलीपासून तो विविध स्पर्धा परीक्षांत यश मिळवत आहे. त्याच्या मेहनतीच्या बळावर आणि श्रीधर कन्या प्रशालेत शिकवल्या जाणाऱ्या तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच त्याला यश मिळाले आहे. या शाळेने आजवर असंख्य गुणवंत विद्यार्थी बनवले आहेत. श्रीधर कन्या प्रशाला ही मराठी व सेमी माध्यमाची शाळा प्रत्येक शैक्षणिक बाबीत नेहमीच अग्रेसर असते त्यामध्ये या परिक्षांबरोबरच कला क्षेत्रातील एलमेंटरी व इंटरमेडीएट परिक्षात आजपर्यंत 100% निकालाची परंपरा आहे तसेच दहावी व बारावी बोर्डाचा निकाल व NMMS परीक्षा, मंथन परीक्षा निकालात नेहमीच अग्रेसर  असणाऱ्या या शाळेचे 2 विद्यार्थी आज राज्यपातळीवर झळकले याचा सार्थ अभिमान संस्था अध्यक्षा रुद्रम्मादेवी पाटील, उपाध्यक्षा यमुना पाटील,  सहसचिव मुकुंदराव पाटील, प्रशालेचे प्राचार्य प्रकाश परिचारक  सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांना सार्थ अभिमान आहे तसेच कै वसंतराव पाटील यांनी ज्या उद्देशाने शाळेची स्थापना केली तो उद्देश आज साध्य झाल्याने त्यांनाही आज प्रशालेकडून या उज्वल यशाच्या माध्यमातून आदरांजली मिळाली तसेच कोणत्याही शाळेच्या वरवरच्या रुपाकडे न पाहता अथवा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येच यश मिळते असा गैरसमज न बाळगता श्रीधर कन्या प्रशाला सारख्या शाळेत येऊन प्रत्यक्ष गुणवत्ता पाहून आपल्या पाल्यांना प्रवेश घेतल्यास त्यांचे भविष्य उज्वल असेल याची खात्री वरील या 2 विद्यार्थ्यांच्या उदारहारांवरून देता येते. 
            लेखाच्या शेवटी प्रशाला व गुणवंत जयदीप व प्रेरणा यांच्या बद्दल एकच वाक्य लिहावंसं वाटत की तुम्ही  
कष्ट इतकं शांततेत केलं की आज तुमच्या यशाचा आवाज संपूर्ण राज्यात पोहचला. अभिनंदन.
शब्दांकन:- श्री विकास राऊत

छत्रपती शिवाजी महाराज

                    नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी। नमो धर्मभूमी जिच्या कामी, पडो देह माझा सदा ती नमामी ।। परमप...